12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, मिरा भाईंदर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘असा’ करा अर्ज
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, एकूण 113 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
या भरती प्रक्रियेत रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD), पूर्णवेळ व अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, साथरोगतज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक यांसारख्या वरिष्ठ पदांचा समावेश आहे.
तसेच परिचारिका (महिला), सुईण, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य कर्मचारी, परिचारक (पुरुष) आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) या पदांसाठीही मोठ्या प्रमाणावर जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदांनुसार निश्चित करण्यात आली असून, यामध्ये MBBS, MD, MS, BAMS, B.Sc., B.Sc. (Nursing), D.Pharm आणि ANM पदवीधारकांना अर्ज करता येईल. इतकेच नव्हे तर, काही पदांसाठी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिरा भाईंदर शहराच्या आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी ही पदभरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
वयोमर्यादा
वयोमर्यादेचा विचार करता, रेडिओलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी यांसारख्या तांत्रिक पदांसाठी जास्तीत जास्त 69 वर्षांपर्यंतची अट ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे अनुभवी डॉक्टरांना पुन्हा सेवेची संधी मिळणार आहे. उर्वरित पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. वयाची ही गणना 4 मे 2026 या दिनांकावर आधारित असेल. विशेष म्हणजे, या भरतीसाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क (Fee) आकारले जाणार नाही.
‘असा’ करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासोबतच पोस्टाने देखील अर्ज करता येणार आहे. (https://mbmc.gov.in/assets/uploads/latest-2916.pdf) 4 मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नोकरीचे ठिकाण मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातच असणार आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आणि अनुभवी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ही एक उत्तम संधी असून, पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.