महिला या शेतीच्या कणा आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि उमेद अभियान या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. राज्यातील ५० लाखांहून अधिक महिला स्वयं-सहायता गटांतील सदस्यांना ५० हजार कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप करून त्यांना ‘लखपती दीदी’ घडवण्याचे काम सुरू आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी सांगितले.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाच्या ४५ व्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये (पीआयसी) झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समितीचे महाव्यवस्थापक विवेक नचाणे, ‘बायफ विकास संशोधन संस्थे’चे अध्यक्ष डॉ. भरत काकडे, ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’चे प्रशासक विद्याधर अनास्कर, ‘नाबार्ड’चे मुख्य महाव्यवस्थापक प्राचार्य जयकिश, महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर उपस्थित होते.
विकसित महाराष्ट्र २०४७ या अंतर्गत २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याचे लक्ष्य ग्रामीण भाग, शेती आणि सहकार क्षेत्राच्या बळावरच साध्य होईल. राज्यातील शेतकरी व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी गेल्या ४५ वर्षांपासून नाबार्डने मोठे योगदान दिले आहे,’ असे भरणे यांनी सांगितले. ‘नाबार्डने उमेद आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना सहकार्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.
‘२०२५-२६ या वर्षांत कर्ज रक्कम ३९ हजार ३८० कोटींवर पोहोचली आहे. महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण संस्थांचे बळकटीकरण हे नाबार्डचे धोरण आहे,’ असे डॉ. भवानी शंकर यांनी सांगितले. स्मृती भगत यांनी स्वागत केले. अविनाश सेवलकर यांनी आभार मानले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन, कृषी पंपांसाठी मोफत वीज, नैसर्गिक शेती अभियान, एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना डिजिटल ओळख या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे.