फोडणी महागली : खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ : सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

गेल्या काही दिवसांपासून खाली तेलामध्ये सातत्याने वाढ होत आहे आतापर्यंतची ही वाढ एकूण 30% पर्यंत झाले आहे. परिणामी याची मोठी झळ सर्वसामान्यांना बसत आहे. सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमती वाढल्याने स्वयंपाकघरातील खर्चात मोठी भर पडली आहे. या वाढीमुळे लोकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून , याचा थेट परिणाम बचतीवर होताना दिसणार आहे. 

सोयाबीनच्या वाढलेल्या किमती (Oil Price) आणि सरकारने खाद्यतेल आयातीवर 20% आयात शुल्क लागू केल्यामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या कमी पुरवठ्याचा फटका देशाला बसला आहे. त्यामुळे पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

सध्याच्या काळात तेलांच्या दरांमध्ये वाढ झालेली दिसून येते. सूर्यफूल तेलाचे जुने दर 120 रुपये प्रति लिटर होते, जे आता 140 रुपये प्रति लिटर झाले आहेत. पामतेलाच्या बाबतीत जुने दर 100 रुपये प्रति लिटर होते, पण ते आता 135 ते 140 रुपये प्रति लिटर दरम्यान पोहोचले आहेत. याचप्रमाणे, सोयाबीन तेलाचे जुने दर 115 ते 120 रुपये प्रति लिटर होते, परंतु त्याच्या नवे दर 130 ते 135 रुपये प्रति लिटर झाल्याचे पाहायला मिळते. या वाढीमुळे नागरिकांच्या खर्चावर मोठा परिणाम होतो आहे, विशेषतः जेव्हा तेलाचा वापर रोजच्या जीवनातील आवश्यक घटक म्हणून केला जातो.

अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करताना सर्वसामान्य जनतेला आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. खाद्यतेल महाग झाल्यामुळे हॉटेल व्यवसायावरही परिणाम झाला आहे. यासाठीच महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि खाद्यतेल दर आटोक्यात आणण्यासाठी सरकारने आयात शुल्कामध्ये कपात करणे, स्वदेशी तेल उत्पादनाला प्रोत्साहन देणे, तसेच सबसिडीचा विचार करावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.