उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच्या 60 व्या वर्धापनदिनी धडाकेबाज भाषण केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचा पक्ष, शिवसेना पक्षाची भूमिका, पक्षाची आगामी वाटचाल यावर भाष्य केलं. सोबतच यावेळी त्यांनी खासदार फुटीवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केले. पुढे पुढे काय घडतंय ते पाहात राहा, असे सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान, आपल्या भाषणात माझ्या पक्षात वशीला चालत नाही. कार्यकर्ता पुढे आला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणात शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरही मोठं विधान केलं.
लाडक्या बहिणी, वारकरी सुखी झाले पाहिजेत
आमची महायुती अशीच पुढे कायम राहील, असे एकनाथ शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु त्यांचे प्रयत्न सफल होणार नाहीत. कारण आमचा अजेंडा खुर्ची नाही. आमचा अजेंडा हा लोकांच्या आयुष्यात बदल करणे आह आहे. महाराष्ट्रात महायुती वेगाने पुढे जाणार आहे. अडीच वर्षाच्या काळात सगळ्या गोष्टींवरील स्थगिती काढून टाकली. विकासाची गाडी बुलेटच्या वेगाने धावते आहे. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी, वारकरी सुखी झाले पाहिजेत, अशी भूमिका यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली.
लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार ना
आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. लाडकी बहीण सुरू झाली. मी माझ्या आईची, बहिणीची काटकसर मी पाहिली आहे. म्हणूनच मी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्या योजनेतही अनेक लोकांनी खोडा घातला. परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना जोडा दाखवला. कोणी माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. हा शब्द मी लाडक्या बहिणींना देतो, असा थेट शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला. शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. माझ्याकडे वशीला लागत नाही, हे सांगायलाही एकनाथ शिंदे विसरले नाहीत.
शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला खासदार केलं
राज्यसभेच्या निवडणुकीत अनेक जण रांगेत उभे होते. परंतु आपल्या शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला म्हणजेच ज्योतीताई वाघमारे यांना राज्यसभेचे तिकीट दिले. या माध्यमातून आपण शिवसेनेची भूमिका राज्याला दाखवून दिली. अगोदर संपत्ती बघून तिकीट दिले जायचे. मंचावरच्या अनेकांनी मला आपल्या मुलासाठी तिकीट मागितले. परंतु मी त्यांना सांगितलं की आपल्याला कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. त्यांनाही मोठं केलं पाहिजे. त्यानंतर या सर्वांनीच तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितले. असे सहकारी माझ्यासोबत आहेत. असे सहकारी सोबत असण्यासाठी नशीब लागते, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.