देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं, शेती करताना त्याला जास्त कष्ट लागू नये यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. सध्या शेतकरी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सरकारकडून ६००० रुपयांची मदत सूर आहे. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक नवीन योजना सुरु केली आहे. पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना असं या योजनेचं नाव आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आज या योजनेला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा एकूण खर्च २४,००० कोटी रुपये प्रतिवर्ष इतका असून तब्बल १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
काय आहे पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना? PM Dhan Dhanya Yojana
पीएम धन धान्य कृषी योजनेअंतर्गत शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या विविध 36 योजनांना एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर यात भर दिला जाईल. यामध्ये देशभरातील १०० जिल्ह्यांचा समावेश असेल. कमी उत्पादकता, पिकांची कमी पेरणी आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज उपलब्धता असलेल्या जिल्हयांना या योजनेत (PM Dhan Dhanya Yojana) स्थान मिळेल. या योजनेअंतर्गत, पीक विविधीकरण, शाश्वत आणि हवामान-लवचिक शेतीवर लक्ष केंद्रित केले जाईल. याशिवाय, कापणीनंतरची साठवण क्षमता वाढवण्यावर आणि तंत्रज्ञान सुधारण्यावरही भर दिला जाईल.
याशिवाय पंतप्रधान धन-धन कृषी योजनेअंतर्गत (PM Dhan Dhanya Yojana) शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारं, बी-बियाणे, खत खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाईल. तसेच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल? यावरही काम केलं जाईल. यासोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी पंप आदी उपकरणं घेण्यासाठीही अर्थसहाय्य केले जाईल.
योजनेचा मुख्य उद्देश काय ?
या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना मदत करणे
शेतीत सुधारणा घडवून आणणे
शेतीचे उत्पादन वाढवणे.
शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची पिके घेण्यास प्रोत्साहन देणे.
ग्रामपंचायत आणि गट स्तरावर धान्य साठवण्याची सोय वाढवणे.
सिंचनाच्या सोयी सुधारणे
शेतकऱ्यांना कमी आणि दीर्घ मुदतीचे कर्ज सहज उपलब्ध करून देणे.