राज्यात यंदा मोसमी पाऊस दडून बसला आहे. अजूनही मोसमी पाऊस राज्यभर पसरलेला नाही. त्यामुळे राज्यभरात पेरण्या रखडल्या आहेत. वरुणराजा कधी एकदाचा बरसतो, याची प्रतीक्षा सगळेच करत आहेत.
दरम्यान, आता पावसाच्या पुढील वाटचालीत खंड पडला आहे. अरबी समुद्रातून पावसासाठी पोषक वारे येतात. या वाऱ्याचा अभाव असल्याने पाऊस पडण्यास विलंब होत आहे. पाऊस जून महिन्याच्या शेवटी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाकडून अभ्यास करून रोज शेतकऱ्यांना पावसाबद्दल माहिती दिली जात आहे. सध्या ताज्या अंदाजानुसार राज्यात 24 जूननंतरच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.
24 ते 25 जून या काळात कोकणात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या हवामान अंदाजाकडे तसेच इतर सूचनांवर लक्ष ठेवावे, असे सांगण्यात येत आहे.