नीट पेपर फुटीच्या प्रकाराने देशभरात शिक्षण व्यवस्थेत गदारोळ सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू आहे. वांगचूक यांना दिल्ली पोलीसांनी उपोषणस्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केले.
तर काॅक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी त्याच ठिकाणी उपोषण सुरू केले आहे.
एकीकडे दिल्लीतील वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे दुसऱ्यांदा परीक्षा घेतल्यानंतरही नीटच्या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. बीड येथील एका विद्यार्थ्याने आपल्याला ५२२ गुण मिळाल्याचा दावा केला आहे, प्रत्यक्षात निकालात त्याला केवळ ९५ गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून सदरील विद्यार्थ्याच्या पालकांनी नीट आणि एकूणच वैद्यकीय शिक्षण क्षेत्र त्याच्या होणाऱ्या परीक्षा, पेपर तपासणी या सगळ्यावरच संताप व्यक्त केला आहे.
बीडच्या सोहम गवते या विद्यार्थ्याला उत्तरतालिकेनुसार ५२२ गुण अपेक्षित असताना स्कोअर कार्डवर अवघे ९५ गुण मिळाले आहेत. त्यामुळे सोहम व त्याच्या पालकांनी या निकालावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
विशेषत: मराठवाड्यातील तरुणांचा निकाल अतिशय चांगला लागल्याचे दिसून येत आहे. यश मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि प्रत्यक्ष निकालात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. या अनपेक्षित निकालमुळे गवते कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. निकालात दुरूस्ती न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा गवते कुटुंबाने दिला आहे. या प्रकरणावर एनटीएकडून अद्याप कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
ज्ञानेश्वरीही धाय मोकलून रडली..
बीड जिल्ह्यातील वडवणीच्या ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. ज्ञानेश्वरीला नीट परीक्षेत अवघे ८७ गुण मिळाले आहेत. मात्र, उत्तरतालिका चेक केली, तेव्हा मला ७००+ मार्क्स मिळतील, असा विश्वास ज्ञानेश्वरीने व्यक्त केला होता. टाॅपच्या रेसमध्ये असलेल्या ज्ञानेश्वरीला केवळ ८७ गुण मिळाल्याने मोठा धक्का बसला आहे. ओ. एम.आर. शीटमध्ये तफावत असल्याचा दावाही ज्ञानेश्वरीकडून करण्यात आला आहे.